Tuesday, September 27, 2022

ओणम मैत्रीचा

तुमची लाडकी मैत्रीण तीन वर्षांनी तुमच्याकडे राहायला येते तेव्हा झालेला आनंद खाण्यातून व्यक्त करावा असे वाटले. गणपतीच्या दिवसातले गोड खाऊन कंटाळलेल्या तिला ओणमच्या निमित्ताने सद्या करूयात असे ठरवले, अर्थात मिनी रुपात. केरळच्या आठवणीतली खाद्यभ्रमंती आणि यु-ट्यूबच्या साहाय्याने पदार्थ निश्चित केले.

© भाग्यश्री अनुराग केंगे
 

पुली इनसी (आल्याचे लोणचे), नेल्लीक्का आचार (आवळ्याचे लोणचे), वेन्डकाय पचडी (भेंडीची कोशिंबीर) , थोरन (कोबीची भाजी stir फ्राय), ओळण (कोहळा आणि चवळी नारळाचे दूध घालून), कुटकरी (सुरण, कच्ची केळी आणि काळे चणे), श्रावण घेवडा (भरपूर ओला नारळ घालून), लेमन रस्सम, साधं वरण, भात, केळं, जिरे- कढीपत्ता घातलेले ताक आणि सोबतीला जिरे घालून गरम पाणी. मी माझ्या पध्द्तीने ह्यात बदल केले. थोरण मध्ये गाजरा ऐवजी सिमला मिरची घातली, कुटकरी मध्ये सुरणाऐवजी रताळी आणि कच्च्या ऐवजी पिकलेली केळी वापरली.
 

ओळण मध्ये कोहळ्या ऐवजी दुधी भोपळा वापरला. ह्यात आवडीपेक्षा ही त्यावेळेला उपलब्ध असलेल्या भाज्यांना झुकते माप दिले. अवियल करायची इच्छा होती, मात्र सगळ्या भाज्या जमवण्यात वेळ गेला असता. मला केळ्याचे वेफर्स, शक्करवराती आणि जेवणासाठी केळ्याची पानं आणून ठेवायला हवी होती. असो, पण झालेले पदार्थ चविष्ट झालेत ह्याची पावती मला मिळाली. खाण्याची मजा, मोठ्या आवाजात आरत्या आणि हातानी केलेल्या बाप्पाचे कौतूक. मैत्रीचा ओणम तर झोकात साजरा झाला.
© भाग्यश्री अनुराग केंगे
टीप - पदार्थाच्या उच्चारामध्ये आणि लिहिण्यामध्ये चूक होऊ शकते. चुकभुल देणे-घेणे 😊
© भाग्यश्री अनुराग केंगे

Sunday, August 14, 2022

प्राजक्ताची फुले आणि स्वातंत्र्य दिनाचे स्वागत

प्राजक्ताची फुले आणि स्वातंत्र्य दिनाचे स्वागत

रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकहून  परतत असतांना, स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत सारे रस्ते तीन रंगात


सजण्याच्या लगबगीत होते. कार्यकर्ते मोठया उत्साहात तीन रंगात फुगे, फिती, रोषणाईची सजावट करण्यात गुंतलेले. काही तरुणांचा गाण्याचा व लेझिमचा सराव चाललेला. सगळीकडे उत्साह आणि सकाळची प्रसन्नता भरुन राहिलेली. पावसाळ्यात सकाळचा विशिष्ट वास असतो, जास्ती पाऊस पडून गेलेल्या ओल्या मातीचा, झाडांचा आणि सकाळचा ताजेपणा अशी सरमिसळ त्यात असते. © भाग्यश्री अनुराग केंगे


ह्या ताजेपणाचा आनंद मनाला मोहवत असतांना, मंदसा ओळखीचा वास आला आणि मी सावधपणे शोधू लागले. समोरचे दृश्य पाहून गाडी तडक बाजूला लावली. एका इमारतीतला पारीजात इतका मोठा झाला होता की त्याने रस्त्यावर प्राजक्ताच्या फुलांचा सडा शिंपला होता. काळ्या रस्त्यावर केशरी देठाची पांढरी फुले इतकी सुंदर दिसत होती! मी सरळ त्यांना वेचायला सुरुवात केली. वेचता वेचता मन बालपणात मुशाफिरी करुन आले. © भाग्यश्री अनुराग केंगे

आमच्या सोसायटीत चैत्र आणि वैशाखात येणारी कुंद, नेवाळी, सायलीची फुले तोडायची चढाओढ असायची तर श्रावण आणि भाद्रपदात बेल आणि प्राजक्ताची फुले वेचण्याची. वेचतांना ताजीच वेचायची, त्याला चिखल लागलेला नको आणि पाकळ्या कोमेजलेल्या नकोत. आताही मग मी तशीच वेचायला सुरुवात केली. झाडालाही जणू हे कळले असावे, वा-याच्या झुळूकी सरशी तो आणखी फुले खाली पाडत होता आणि माझी ओंजळ भरत होती. भर रस्त्यातले माझे हे फुले वेचणे सकाळी फिरायला जाणारे आश्चर्याने बघत होते. काही ’बहाद्दर’ दुचाकी आणि चारचाकीचा मुद्दाम हार्न वाजवून पुढे जात होते. मी मात्र कशाचाही विचार न करता  मनसोक्त फुले वेचली, फोटो काढले आणि त्यांच्या सुगंधात  तरंगतच घरी पोहोचले. हिरवेगार पारिजातकाचे झाड, पांढ-या पाकळ्या आणि केशरी देठ... अरेच्चा, निसर्गही भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाचीच तयारी करतोय तर! मनाने तिरंग्याशी त्याची सांगड घातली. © भाग्यश्री अनुराग केंगे

थोडयाच वेळात रहदारी सुरु होईल. गाडयांखाली फुलं चिरडून जातील आणि पेट्रोलच्या दर्पात त्यांचा सुगंध हरवून जाईल. मात्र रात्री हे सगळे शांत झाले की कळ्या परत उमलायला लागतील कारण उदया सकाळी त्यांना फुलायचे आहे ना, आपल्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दयायला! तोच सुगंध, आणि तेच तीन रंग.

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले !

© भाग्यश्री अनुराग केंगे

# 75th Independence day
#
Independence day
#
Independence day celebration
#
Har ghar Tiranga
# Good Morning
# Parijat flowers
# Harsingar
# I love India





Saturday, June 20, 2020

अनावश्यक ते अत्यावश्यक व्हाया कोरोना

कोरोना विषाणूने अवघ्या जगात थैमान मांडले आहे. जागतिक पातळीवर आणि देश पातळीवर त्यासोबत
लढण्यासाठी अविरत प्रयत्न चालू झाले आणि त्यातूनच आला हा लॉकडाऊन. एका विशिष्ट लयीत चाललेले आपले आयुष्य एकदम खीळ लागल्यागत थंडावले. सुरुवातीला पहिला आठवडा सक्तीने का होईना, सगळे घरी होते - अगदी ब्रेकफास्टपासून रात्री झोपेपर्यंत. ह्या आनंदात घरोघरच्या सुगरणी सुखावल्या. मुलांच्या, नवरोबांच्या फर्माइशी पूर्ण करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. त्यामुळे डालगोना कॉफी, बनाना आईसक्रीम, पाव, रुमाली खाकरा, दहीवडे ट्रेंडींग झाले. व्हॉटसअ‍प स्टेटस, इन्स्टा स्टोरीज आणि फेसबुक पोस्टवर ह्या पदार्थांचे फोटो मानाने अवतरले. यथावकाश "रोज काय नवीन करायचे बाई?", हा आयांचा प्रश्न आपल्या कोरोना प्रश्नापेक्षाही मोठा झाला. दर वीकएण्डला बाहेरच जेवायचे, अशी आपली संस्कृती बनल्यामुळे गृहिणींनी यु-ट्यूबला शरण जात अनेक आधुनिक पदार्थांची (थोडक्यात हॉटेलमधील) घरी करण्याची शर्थ पार पाडली. सोशल मिडियावर फोटो टाकायचे असल्याने पदार्थाची सजावट, टेबलाची मांडणीही आकर्षक व्हायला लागली. मात्र लॉकडाऊन जसजसा वाढत गेला, तसा भाजी किंवा वाणसामान मिळणे थोडे कठीण व्हायला लागले, तसा हा पदार्थांचा फॅन्सीनेस थोडा कमी झाला. गृहिणींसकट घरच्यांनाही आपले नेहमीचे जेवण आवडू लागले. मुख्य म्हणजे बाहेरचे न खाताही आपल्या आनंदाने जेवता येते आणि पोटही भरते, ह्या साक्षात्कार अनेकांना, विशेषत: मुलांना झाला. भरीसभर वाढदिवस, लग्न वाढदिवसही घरच्या घरीच साधेपणाने व आनंदाने साजरे झाले.
आपली आई-बायको किती काम करते, हे अनेकांना प्रत्यक्ष बघायला मिळाले. घरच्या मदतनीसांना सुट्टी असल्याने ते ही काम वाढलेलेच. आया जर वर्क फ्रॉम होम असतील तर हे काम आता तिहेरी झालेले. त्यामुळे अनेकांकडे मुलांनी, नव-यांनी सफाई कामे आनंदाने स्वीकारली. झाडू, भांडी ते पाककलेतली प्रगती अशा सोशल पोस्ट वाढल्या. एकामुळे दुसरा प्रोत्साहित होऊन एकूणच समाजाची मानसिकता बदलायला हातभार लागला. मात्र हा बदल किती वेळ टिकतो हे काळच ठरवेल. पण महत्त्वाचे हे की घराघरातून सहकार्याची भावना वाढीला लागली. त्याचे पडसाद समाजातही उमटले. अनेकजण मास्क बांधून गरजूंना शिधा/अन्न वाटपासाठी रस्त्यावर उतरले. ज्यांना प्रत्यक्ष शक्य नव्हते त्यांनी आर्थिक मदत पुरवली.

लॉक डाऊनच्या काळात पुरेसा वेळ हाताशी असल्याने अनेकांमधले सुप्त गुण जागे झाले. अनेकांमधले लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, वीणकाम, भरतकाम, बागकाम... आपली कलाकृती सोशल मिडीयावर पेश करून वाहवा मिळवू लागले. ह्यात सिने/टिव्ही कलाकार ही मागे नव्हते. अनेकांनी स्वतःचे युट्यूब चॅनलवर vlogs करुन आपले फॅन फॉलोवर्स वाढवले. सामान्य प्रेक्षकांबरोबर गाणी गाऊन गायकांनी व्हिडीयो प्रकाशित केले. नृत्य व योगावाल्यांनीही एकमेकांना टॅग करत कलाकृती सादर केल्या. तुम्ही कुठल्याही ठिकाणी असा, प्रत्येकाने स्वतःचा व्हिडिओ शूट करुन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकसंध बांधायचा आणि पेश करायचा. त्यामुळे प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन झाले. टिव्हीपेक्षाही इंटरनेट हे संपर्काचे आणि मनोरंजनाचे मुख्य साधन झाले. त्यामुळे सोशल मिडीयावर ’चॅलेंज’फारच बोकाळले, जसे फिर मुस्कुरायेगा इंडिया, सिक्स पॅक चॅलेंज, साडी चॅलेंज, जोडी चॅलेंज, पुस्तक
चॅलेंज, सिनेमा चॅलेंज, पाककृती चॅलेंज ...वगैरे. आता हे फोटो टाकून आपल्या दहा मित्रमैत्रिणींना टॅग करायचे, मग ते पुढच्या दहांना करणार. अश्या पध्दतीने ही साखळी पुढे वाढत राहते. ह्यात ज्ञान कमी, मनोरंजन भरपूर आणि वेळ पटकन जायला लागला. वेळ जायला आणि मनोरंजनाला हॉट स्टार, अ‍ॅमेझॉन प्राईम, एमएक्स प्लेयर, नेट फ्लिक्सच्या बरोबरीने केबल टिव्ही आणि युट्यूब आहेतच. आधीच्या पिढीने जुने सिनेमे पाहिले तर तरुण प्रेक्षकांकरता वेबसिरीज, शॉर्ट फ्लिम्सचा सागर समोर आहे. किती बघाल? थकून जाल! पण ह्या चित्रकृती संपणार नाहीत. बींज वॉच (Binge watch)ची नवी क्रेझ आली आहे. चित्रकृतींचे सगळेच्या सगळे भाग एका बसणीत बघून टाकायचे. वेळही भरपूर आणि वाटही बघायला नको! अनेकांना फक्त घरच्यांबरोबर काय वेळ घालवायचा म्हणून मग नातेवाईकांशी, शाळा, कॉलेजसोबतींशी ऑनलाईन गप्पा वाढल्या, ऑनलाईन खेळ खेळता यायला लागले. झूम, गुगल हॅंगआऊट ह्यांचा वापर भरपूर वाढला आणि आभासी जगातही माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे दिसून आले.

होता होता एका महिन्यात ऑफिसचे काम घरुन करणा-या मोठयांच्या बरोबरीने तरुणांचा व लहानांचा स्क्रीन टाईम नकळत वाढला. ऑनलाईन शैक्षणिक संस्थांनी वेगवेगळे कोर्सेस जाहीर केले. सर्टीफिकेटचेही महत्व पटवून दिले. दहावी-बारावीचे क्लासेसवालेही ऑनलाईन क्लासरुमचे सर्मथन करायला लागले. युट्यूबर्स शिक्षकही पुढे सरसावले. आता तर शाळा आणि कॉलेजेसनी आपले वर्गच झूम आणि गुगल क्लासरुममध्ये भरवायला सुरुवात केल्याने विद्यार्थांना वही-पेनपेक्षा ही संगणक-मोबाईल आणि डेटा कनेक्शन अत्यावश्यक झाले आहे. त्याच्याशिवाय रोजचा अभ्यास पूर्ण कसा व्हायचा? खालच्या स्तरांवरच्या विद्यार्थांचे काय? खेडयांमध्ये वीज नसते त्यांचे काय? असे अनेक प्रश्न मनात येतातच. पण सध्यातरी पांढरपेशा घरातली मुलं ऑनलाईन अभ्यास करत आहेत, खरं तर असं त्यांच्या पालकांना वाटते. मात्र ऑनलाईनची ही वाट इतकी निसरडी की माऊसने अभ्यासाव्यतिरीक्त दुस-या टॅबमध्ये भलतेच काही उघडायचे नाही, हे पूर्णत: त्या विद्यार्थ्यावरच अवलंबून आहे. कारण पालकांना हे समजायला, स्क्रीनवर लक्ष ठेवायला ते आपल्या मुलांइतके नक्कीच स्मार्ट नाहीत. ऑफिसचे काम करतांनाही हेच लक्षात असायला हवे. टीम वेगवेगळ्या ठीकाणी बसलेली असतांना, आठ-दहा तास काम करुनही हवी असलेली प्रॉडक्टीव्हिटी मिळत नाही अशी कंपन्यांची ओरड आहे.

कोरोनामुळे आर्थिक मंदी आलेलीच आहे. बेरोजगारी आणि पगारातही कपात आहे. मात्र आर्थिक क्षेत्रातील अनेकांनी contingency fundsचे महत्व अधोरेखीत केले. वैयक्तिक असो अथवा व्यावसायिक, दोन्हीकडे ही आपत्कालीन रक्कम ज्यांनी राखीव ठेवली होती त्यांना फारसा त्रास झाला नाही. अनेकांना त्याची गरज पटली आहे. काही सुज्ञ गुंतवणूकदारांनी म्युच्युवल फंड आणि इक्विटीत गुंतवणूक वाढवली. २००८ सालच्या मंदीच्या काळात घाबरलेले गुंतवणूकदार आता मात्र समजदारीने वागले आहेत. ह्यात इन्शूरन्स कंपन्याही मागे नाहीत. ते प्रत्येकाला हेल्थ इन्शूरन्स व्हिथ करोनाचे महत्व सांगताहेत, टर्म प्लान घ्यायला सांगताहेत. हे असले तरी सामान्य माणसाला Spend less, Save more ह्या तत्वावर चालणे शहाणपणाचे ठरणार आहे. ह्यासाठी आपल्या आधीच्या जीवनशैलीपेक्षा अजून किती साधेपणा आणता येईल, अनावश्यक खरेदी कशी टाळता येईल हे बघायला हवे. लॉकडाऊनच्या काळात केवळ काही जोड कपडयांचे सहज पुरतात, चपलांचे एकच जोड पुरतात, गाडी नाही चालवली तर बिघडत नाही, बाहेर खाल्ले नाही तरी चालते, ह्या आणि अश्या रोजच्या राहाणीमानातल्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला सहज कळल्या आहेत. खरंतर consumerism कमी करुन साधे आणि शाश्वत जगण्याकडे वाटचाल कोरोनाने करुन दिली आहे. ही वाट आता अर्धवट सोडता कामा नये, कारण त्यामूळे तरी वसुंधरेवरचा भार थोडा कमी होईल आणि पुढच्या कित्येक पिढ्या अधिक आरोग्यपूर्ण आणि आनंदी जगू शकतील.

- भाग्यश्री केंगे
bhagyashree@cyberedge.co.in

सदर लेख पालकनीती (पुणे) ह्या मासिकात प्रकाशित झाला आहे.

#COVID 19 #Corona #StayHome #Staysafe #Corona Maharashtra

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...